तक्रार निवारण दिनी जिल्हयात एकुण १६९ पैकी ९६ तक्रारींचे लागलीच निवारण;जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आवाहनास नागरिकांचा प्रतिसाद…

नंदुरबार:- राज्य शासनाचे 100 दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत जिल्हयातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे काही तक्रारी समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसींगचे माध्यमातुन जनतेशी संवाद साधता यावा, या उददेशाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी प्रत्येक शनिवारी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा स्त्युत्य उपक्रम सुरु केला आहे.
त्याअनुषंगाने जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी विसरवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून व समजून घेत त्यांचे तक्रारीचे योग्य निरसन करुन त्यांचे समाधान केले. त्यामध्ये नागरिकांचे वेगवेगळ्या तक्रारींचे निरसन करुन नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथील तक्रार निवारण कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी नागरीकांचे तक्रारींचे निराकरण केले. व इतर पोलीस ठाणे येथे संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन स्वतः नागरिकांचे तक्रारींची दखल घेत त्यांचे समाधान केले.
आयोजित तक्रार निवारण दिनी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात एकुण 169 तक्रारींपैकी
96 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले.
सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, सहा. पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व स्टाफ यांचे उपस्थितीत पार पडला.
प्रविण चव्हाण, नंदुरबार प्रतिनिधी